|
मराठी रंगभूमीला लाभलेला एक अनमोल हिरा म्हणजे स्व. काशीनाथ घाणेकर ! अत्यंत
देखणं व्यक्तीमत्व आणि तितकाच समर्थ अभिनय ! सहज आठवायचं म्हटलं तर घाणेकरांची
कितीतरी सुपहिट नाटकं आपल्याला आठवतात . आज मला तुम्हाला, माझ्या मनात जणू घर करून
बसलेली एक आठवण सांगायचीय .
असाच काशिनाथ घाणेकर नायक असलेल्या एका नाटकाचा प्रयोग . स्थळ बालगंधर्व
रंगमंदिर . नाटकात काशिनाथ असल्यामुळे ते हाउसफुल्ल होतं हे वेगळं सांगायला
नकोच ! तसं नाटक फारसं गाजलेलं नव्हतं . सुरूंग किंवा असंच काहितरी त्या
नाटकाचं नाव असावं . पण त्यातल्या नायकाच्या भूमिकेत घाणेकर हळूहळू रंग भरत
होते . पण नंतर त्यांचा अभिनय विलक्षण आक्रमक होत गेला. प्रेक्षक एव्हाना त्यांच्या
केंव्हाच ताब्यात गेले होते . काशिनाथ त्यांच्या थोड्याश्या आक्रस्ताळ्या
आविर्भावाने प्रेक्षकांच्या भावनांशी लीलया खेळत होते .त्या दिवशी पहिल्या रागेत
बसून हा प्रयोग पहात होतो . माझ्याच रांगेत काही खुर्च्या सोडून विख्यात
संगीतदिग्दर्शक सी . रामचंद्र बसलेले होते .
संपूर्ण नाटकाचं वळण बदलणारी एक भलंमोठं स्वगत घाणेकर बोलू लागले .
त्यांच्या गळ्याच्या शिरा ताणल्या गेल्या . डोळ्यात कधी अंगार फुलायचा तर कधी
मूर्तीमंत कारूण्य प्रगटायचं सर्व ताकद एकवटून ते आवाज फेकत होते . जणू
त्यांची सर्व प्राणशक्ती त्यांच्या चेहेर्यावर एकवटली होती. माझ्या झरकन मनात
आलं देव न करो पण हे इतकी ताकद लावताहेत कि न जाणो त्यातच त्यांच्या जिवाला काही
बरंवाईट व्हायचं . माझ्या मनात हा विचार उमटतोय एव्हढ्यात पहिल्या रांगेत बसलेले
सी. रामचंद्र गहिवरलेल्या आवाजात ओरडले " अरे ! एव्हढी ताकद लावली तर मरेल रे हा
! क्षणभर सारं सभागृह अवाक झालं पहिल्या रांगेत बसलेल्या मला तर
काशिनाथजींच्या गहिर्या डोळ्यात अश्रू चमकल्याचा भास झाला . सुदैवाने काही
अपप्रसंग न घडता नाटक संपलं .रात्री माझ्या मनात मात्र एका मनस्वी कलावंतानं
दुसर्या मनस्वी कलावंताला दिलेली ती जगावेगळी दाद घुमत होती .
|