| |
मी रामायण !
नुसत्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर
अवघ्या भारतातल्या मराठी श्रोत्यांबद्दल मला खरोखरच खूप कौतुक वाटतं !त्या
काळात गीत प्रक्षेपित व्हायच्या आधी तुमच्यापैकी अनेक सश्रद्ध रेडियोला
मनोभावे हात जोडायचे ,हार घालायचे समोर उदबत्त्या लावायचे आणि गीत संपल्याव चक्क
प्रसाद सुद्धा वाटायचे .तुम्हाला सांगतो , १९५६ च्या रामनवमीला गीतरामायणातलं
शेवटचं म्हणजे छपन्नावं गीत प्रक्षेपित झाल आणि त्यानंतर कितितरी काळ , शनिवार
सकाळचे साडेआठ वाजले, कि तुम्हाला अचूक गीतरामायणाची आठवण होत होती
.चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं .काहितरी आपण हरवून बसलो आहोत या भावनेनं तुम्ही
हळहळत होतात. आणि मग तुम्हीचं आकाशवाणीवर पत्रांचा भडिमार करून पुन्हा एकदा
गीतरामायणाचं संपूर्ण प्रक्षेपण घडवून आणलंत .त्यानंतरही साखळी अशीच चालू
राहिली आहे . पुण्याहून अनेकवेळा, मुंबईहून दोन वेळा आणि नागपूर, इंदौर, भोपाळ ,
हैद्राबाद , दिल्ली अशा विविध प्रांतातील केंद्रांवरून गीतरामायणाचं पुन्हापुन्हा
प्रक्षेपण केलं गेलं .आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा , कुठल्या ना कुठल्या केंद्रावर
गीतरामायण वाजतच असतं. खरोखरी गीतरामायणाला अंत नाही . ते अजरामर आहे .
.गदिमांच्या मनात रामप्रीतीचा अंकुर कसा निर्माण झाला हे आपण गेल्या
भागात पाहिले . या अंकुराचे पुढे रोपट्यात रूपांतर झाले तो दिवसही योगायोगाने
रामनवमीचाच होता .आणि सुमारही होता दुपारी बारा वाजण्याचाच !
ही गोष्ट आहे १९३६ सालची . मॅट्रीकची परीक्षा नापास झाल्यामुळे गदिमा अगदी
निराश झाले होते .काही झाले तरी आता घरी परत जायचे नाही या विचारात , रणरणत्या
उन्हात ते पुण्याच्या मंडईच्या परिसरात उपाशीपोटी भटकत होते .तोचपंडित
नेहेरूंसारख्या दिसणार्या एका व्यक्तीने मागून येउन त्यांचा शर्ट अचानक
धरला.गदिमांनी दचकून पाहिले तर ती व्यक्ती म्हणजे , रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर
होती . ज्या मोरोपंतांनी प फ ब भ म हे शब्द येउ न देता लिहिलेल्या निरोष्ठ
रामायणासारखी एकशे आठ रामायणं लिहिली त्या मोरोपंतांचे हे वंशज !रामकृष्णपंत मग
गदिमांना आग्रहाने आपल्या घरी घेउन गेले. त्यांचं घर म्हणजे सक्षात ज्ञान भांडार
होते . तिथे गदिमांना मयूरपंतांची ही एकशे आठ रामायणे वाचायला मिळाली . दिवसरात्र
ती रामायणे पुन्हापुन्हा वाचण्यात गदिमांचे देहभान हरपून जात असे .
समर्थांना जसे रामाचे भूत लागले होते तसे आता जणू गदिमांनाही ते लागले
होते . रामावर काहीतरी लिहावे हा विचार तेंव्हापासून ते सतत मनात वागवत
राहिले .
|