|
आपण सर्व मराठी आहोत. मराठी ही आपली मातृभाषा आहे . जन्माबरोबर माणसाला काही गुण परंपरेने
मिळतात . आपण भाग्यवान अशा अर्थानं कि जन्माबरोबर आपल्याला श्री शिवाजीमहाराजांबद्दलचा
जाज्वल्य अभिमान लाभला.
कानड्या विठ्ठलाची , वक्रतुंड गणरायाची आणि मराठमोळ्या खंडेरायाची भक्ती लाभली . तुळजाभवानीची
शक्ती लाभली .
पहिल्या बाजीराव पेशव्याची महत्त्वाकांक्षा लाभली . नाना फडणिसांचं चातुर्य लाभलं ,
शाहू फुले आंबेडकरांचं द्रष्टेपण लाभलं
ज्ञानोबातुकोबांच्या प्रतिभेनं आपण फुलारलो तर मोरोपंतांच्या आणि वामनपंडिताच्या
पांडित्यानं आपण दिपून गेलो .
लोकशाहिर रामजोशी आणि अनंत फंदीच्या शृंगारकवनांनी आपण बेभान झालो तर परशुराम आणि पठ्ठे
बापूरावांच्या लावण्यांनी आपण हरखून गेलो .
बालकवी ठोंबर्यांच्या फुलराणीनं आपण उमललो तर केशवसुतांच्या तुतारीन आपल्याला
उगवत्या काळाचं भान दिलं .
गदिमांच्या प्रतिभेवर आपण कौतुकाची फुलं मनसोक्त उधळली . तरआचार्य अत्र्यांच्या आणि
पुलंच्या विनोदानं आपण खळखळून हासलो . केशवराव भोसले आणि बालगंधर्वांचं आपण मनसोक्त
कोडकौतुक केलं तरव्ही शांताराम आणि मास्टर विनायकांच्या अजरामर चित्रपटकलेला आपण डोक्यावर
घेतलं . मराठी माणसाच्या अजोड गुणग्राहकतेची अशी किती उदाहरणं सांगावीत ?
हे सारे गुणीजन आपल्या मायमराठीच्या अंगाखांद्यावर वाढले . मराठीच्याच
आधारानं या सार्यांचा वेलू गगनावेरी गेला .
या सार्यांचं कर्तृत्व मराठीमुळं झळकून उठलं कि या सार्यांमुळे आपल्या मातृभाषेचं वैभव
वाढलं ? खरोखर " कवणे कवणा अलंकारिले ? असाच प्रश्न हा ! तर या सार्यांनी वाढवलेल्या
मराठी भाषेच्या वैभवाची आणि मराठी भाषेमुळे नावारूपाला आलेल्या या सार्यांची ओळख करून
घेउया " भाषांमाजी भाषा मराठिया " या लवकरच सुरु होणार्या सदरात !
|